Kheliyad

Advertisement
Social Connect

अंध, अपंगांचे ‘दीपस्तंभ!’

July 21, 2015 · · comments

deepstambha foundation
Add caption
 
अंध, अपंगांचे ‘दीपस्तंभ!’

जळगावात दीपस्तंभ फाऊंडेशनतर्फे अंध, अपंगांसाठी भारतातील पहिले स्पर्धापरीक्षा मार्गदर्शन केंद्र उभारण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या केंद्रातील ७० ते ८० टक्के विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे. अंध, अपंगांचे मनोबल वाढविणाऱ्या या उपक्रमाविषयी...





महेश पठाडे
rhythm00779@gmail.com
mob. 8087564549
 
अंधांमध्ये भारतातला पहिला आयएसएस कृष्णा तिवारी मध्य प्रदेशातील उमरिया जिल्ह्यात कलेक्टर आहे. जिद्दीच्या बळावर अंध, अपंगांमध्येही अधिकारीपदावर पोहोचण्याची क्षमता आहे. मात्र, त्यांना कोणाचं मार्गदर्शनच मिळत नाही. भारतात तशी व्यवस्थाच नाही. आता ही उणीव जळगावच्या दीपस्तंभ फाऊंडेशनने भरून काढली आहे. फक्त अंध, अपंगांसाठी स्पर्धापरीक्षा मार्गदर्शन केंद्र उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाजवळ उभारण्यात येणार आहे. विशेष म्हणजे अंध, अपंगांसाठी सुरू करण्यात आलेले हे मार्गदर्शन केंद्र भारतातील एकमेव आहे. या मार्गदर्शन केंद्रात प्रवेशासाठी महाराष्ट्रभर नुकतीच परीक्षा झाली. त्यातून निवडक विद्यार्थ्यांना या केंद्रात प्रवेश दिला जाणार आहे. हे प्रशिक्षण दीड वर्षासाठी असून, यूपीएससी, एमपीएससी, बँक अशा परीक्षांवर मार्गदर्शन केले जाणार आहे. यात निवास, भोजन व्यवस्थाही संस्थेतर्फे करण्यात येणार आहे.
 
तुम्ही मुंबईत असाल तर लोकलचा जीवघेणा प्रवास करून दाखवा, तुम्ही नाशिकमध्ये असाल तर द्वारकेवर पायी जाऊन दाखवा आणि जळगावात असाल, तर कोर्ट चौक ते गणेश कॉलनीचा प्रवास करून दाखवा. ही आव्हाने धडधाकट व्यक्तींसाठी किती नकोशी वाटत असतील! विचार करा, हीच आव्हाने अपंगांसाठी किती भयंकर असतील!
रोजच ही जगण्याची लढाई लढताना त्यांच्या वाट्याला येणाऱ्या यातना कल्पनातीत आहेत. मात्र, त्यांना उभं करण्यासाठी प्रेरणा, प्रोत्साहन देण्याची गरज आहे. अंध, अपंगांच्या यातना सुसह्य करण्याचं, त्यांच्या पंखांत बळ भरण्याचं आणि केवळ त्यांनाच मोठं करण्याची ‘दीपस्तंभ’ची अनोखी आणि कौतुकास्पद योजना आहे. ही योजना केवळ जळगावपुरती मर्यादित नाही, तर देशभरातील अंध, अपंगांसाठी हे निवासी केंद्र ‘दीपस्तंभा’सारखं दिशा देत राहील.
मध्यंतरी व्हॉट्सअॅपवर एक व्हिडीओ क्ल‌ीप सातत्याने फिरायची. एक भिकारी आपल्या अपंगत्वाचं भांडवल करीत एका भव्यदिव्य शासकीय बंगल्याच्या गेटजवळ उभा राहतो. अपेक्षा एकच, की काही तरी पैसे पदरात पडतील. तेवढ्यात एक कार गेटवर येते. भिकारी त्या कारकडे आशाळभूतपणे पाहतो. मात्र, त्या कारमधला अधिकारी त्याच्याकडे ढुंकूनही पाहत नाही. त्या अधिकाऱ्याचे ते दुर्लक्ष करणे क्षणभर निर्दयी वाटते. चौकीदार गेट उघडतो. कार आत जाऊन थांबते. येथे त्या अपंग भिकाऱ्याच्या अपेक्षा पुन्हा बळावतात. कारमधून त्या अधिकाऱ्याचा एक असिस्टंट उतरतो आणि त्याला उतरण्यासाठी आधार देतो. तो अधिकारी कारमधून उतरतो तेव्हा धक्का बसतो. तो अधिकारी दोन्ही पायांनी अपंग असतो! ते पाहून अपंग भिकारी ओशाळतो. आपण तर एकाच पायाने अपंग आहोत हे पाहून तो निमूटपणे तेथून निघून जातो. या व्हिडीओ क्ल‌पिमधून मिळणारा संदेश अंतर्मुख करून जातो. तुम्ही हतबल नाही. तुम्ही पराभूतही नाही. अपंगांसाठी हा संदेश पुरेसा आहे.
ही व्हिडीओ क्ल‌ीप आठवण्याचे कारण म्हणजे अपंगांमध्ये अधिकारी होण्याची क्षमता आहे. म्हणूनच त्यांना मार्ग दाखविण्यासाठीच स्वतंत्र मार्गदर्शन केंद्राची गरज होती. तसं पाहिलं तर अंध, अपंगांसाठी राज्य, केंद्र सरकारच्या अनेक योजना आहेत. त्यांच्यासाठी अनेक कायदेही आहेत. मात्र, त्याचा उपयोग अपंगांनाच होत नसल्याचे वास्तव आहे.
 
राज्यात २९ लाखांवर अपंग
राज्यात २००१ च्या जनगणनेनुसार अपंगांची संख्या १५ लाख ६९ हजार ५८२ इतकी होती, तर २०११च्या जनगणनेनुसार हीच संख्या २९ लाख ६४ हजारांहून अधिक आहे. यात अंध, मूकबधिर, अस्थिव्यंग, मानसिक आजार, बहुविकलांग अशा विविध प्रकारचे अपंगत्व आलेल्या व्यक्तींचा समावेश आहे. असे असले तरी शारीरिकदृष्ट्या अपंग व्यक्तीही अनेक क्षेत्रांत कर्तृत्व गाजवू शकतात. १९९५च्या कायद्यानुसार अपंगांना प्रशासनात तीन टक्के आरक्षण आहे. असे असतानाही उच्च अधिकारी पदांवर या संवर्गातील विद्यार्थी फारसे आढळत नाहीत, त्याचे कारण म्हणजे मार्गदर्शनाचा अभाव. शिक्षण घेत असताना त्यांना स्पर्धा परीक्षा व करिअरबाबत प्रेरणा, प्रोत्साहन, समुदेशन व प्रत्यक्ष मार्गदर्शन कोणी करीत नाही.
 
अपंगांचे प्रश्न सोडविण्यासाठी मोर्चे काढणे सोपे आहे. असे केल्याने अपंगांसाठी आपण काही तरी करीत आहोत, अशी काही संस्था, संघटनांची भावना निर्माण झाली आहे. मात्र, एक प्रश्न सुटला तर दुसरा आ वासून उभा राहतो. प्रश्न, समस्यांची मालिका कधीच संपत नाही. गरज आहे अंध, अपंगांना उभं करण्याची. दीपस्तंभ फाऊंडेशनने हेच ओळखले आणि गेल्या महिन्यातच जुलैपासून त्यांच्यासाठी निवासी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू केले. ही संस्था २००५पासून शिक्षणातील गुणवत्तावाढीसाठी महाराष्ट्रातील ग्रामीण व आदिवासी भागात झटत आहे. महाराष्ट्रातील अत्यंत गरीब व होतकरू, तसेच निराधार अशा २०० विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना वर्षभर स्पर्धा परीक्षांचे विनामूल्य प्रशिक्षण ही संस्था २०११ पासून देत आहे.
मार्गदर्शन केंद्राची निवडपद्धतही सुटसुटीत आणि आदर्श आहे. मार्गदर्शन केंद्रात प्रवेशासाठी महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांत अंध, अपंग पदवीधर विद्यार्थ्यांची २८ जून रोजी प्रवेश परीक्षा घेण्यात आली. दहावीपर्यंतच्या अभ्यासक्रमावर आधारित या परीक्षेतून १०० विद्यार्थ्यांची मुलाखत घेऊन निवड करण्यात आली. या निवड झालेल्या विद्यार्थ्यांना दीड वर्ष यूपीएससी, एमपीएससी, बँक, रेल्वे आदी स्पर्धा परीक्षांचे निवासी प्रशिक्षण दिले जाणार आहे.
ब्रेल लायब्ररीही...
विशेषतः अंध विद्यार्थ्यांसाठी उच्चस्तरीय स्पर्धा परीक्षांचे सर्व संदर्भ साहित्य ब्रेल लिपीत करण्यात येणार आहे. त्याचे काम ‘दीपस्तंभ’नेच स्वतः हाती घेतले आहे. ही सर्व पुस्तके ऑडिओ स्वरूपातही तयार केली जाणार आहेत. त्यासाठी नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड, स्पर्शज्ञान, सावित्री फोरम, सक्षम, ज्ञानप्रबोधिनी, सिनर्जी, एनआयव्हीएच या संस्थांचे सहकार्य घेतले आहे. त्याचबरोबर ब्रेल लायब्ररीही सुरू केली जाणार आहे. या प्रकल्पातून अपंग विद्यार्थ्यांना आत्मविश्वास मिळेल यात शंका नाही. अंध, अपंगांना समुपदेशन करण्यासाठी अंधांमधूनच दोन तज्ज्ञ मार्गदर्शकांचीही नियुक्ती करण्यात आली आहे.
 
वाढतोय लोकसहभाग
अपंगांसाठी निवासी केंद्र उभारण्याचे आव्हान पेलताना संस्थेच्या मदतीसाठी रतनलाल सी. बाफना ट्रस्टने खारीचा वाटा उचलला. त्यांनी या प्रकल्पाला एक कोटी रुपयांची देणगी दिली. या मदतीमुळे अपंगांसाठी काम करण्यासाठी, त्यांच्या प्रगतीसाठी आम्हाला बळ मिळाल्याचं दीपस्तंभ फाऊंडेशनचे संचालक यजुर्वेंद्र महाजन यांनी आवर्जून नमूद केलं. अर्थात, या अभिनव प्रकल्पासाठी दोन कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाजवळ दहा हजार स्क्वेअर फूट जागेत हे केंद्र साकारण्यात येणार असून, या प्रकल्पासाठी लोकसहभागही वाढत आहे. बाफना यांनी त्यांच्या ट्रस्टतर्फे एक कोटी रुपये दिल्याने त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या केंद्रास रतनलाल सी. बाफना यांचे नाव देण्यात आले आहे. अपंगांच्या मार्गदर्शन केंद्रातून उद्याचा सुदृढ भारत निर्माण करणारी ही संकल्पना म्हणूनच प्रेरणादायी आहे.



मला अनेक अंध, अपंग विद्यार्थी भेटले. मात्र, त्यांना स्पर्धापरीक्षेविषयी फारशी माहितीच नसल्याचे जाणवले. अंध, अपंगांसाठी स्पर्धापरीक्षेवर मार्गदर्शन करणारे केंद्रही भारतात अस्तित्वात नाही. त्यामुळेच मी हा निर्णय घेतला.
- यजुर्वेंद्र महाजन, संचालक, दीपस्तंभ फाऊंडेशन, जळगाव


(Maharashtra Times, Nashik, Jalgaon : 5 July 2015) 
 

Comments

Powered by Blogger.

About Me

My photo
Hello friends I am Mahesh Pathade. I have been working as a Senior Copy Editor in Maharashtra Times newspaper. I have 15 years of experience in journalism. I have worked in newspapers in Nashik, Jalgaon etc. I have experience working in major newspapers like Sakal News papers group, Dainik Bhaskar Group, Times of India group. Sports is my favorite. Along with sports, I have written extensively on film and literature. Sports review is my favorite. I have interviewed many international players. Interviews by several players including Hindakesari wrestler Maruti Mane, International hockey player Dhanraj Pillay, cricket fan Sudhir Gautam Chaudhary, Grandmaster Pravin Thapse, Vidit Gujrathi and others have been featured. I have International FIDE rating in the game of Chess.