Kheliyad

Advertisement
Sports Review

उत्तर महाराष्ट्राच्या कबड्डीला ऊर्जा मिळेल?

August 18, 2014 · · comments

थायलंड कबड्डी संघाचा नाशिक दौरा नुकताच झाला. नाशिक जिल्हा कबड्डी संघटनेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाचं औचित्य साधून क्रीडा प्रबोधिनीने थाई संघासह राज्यस्तरीय पुरुष व महिला कबड्डी स्पर्धा आयोजित केली. अर्थात, ही स्पर्धा वर्चस्वासाठी नव्हती, तर अनुभव आणि कौशल्याचं शेअरिंग होतं. 

महेश पठाडे
mahesh.pathade@timesgroup.com
rhythm00779@gmail.com
Follow me
          



असं म्हणतात, की थायलंडला कधीही युद्धाला सामोरं जावं लागलेलं नाही. किरकोळ चकमकी वगळता या देशाने युद्ध नेहमीच टाळले आहे. थाई लोकांमधला शांतताप्रिय आणि विनयशिलतेच्या गुणाचा महिमा असेल कदाचित. कबड्डी खेळतानाही त्यांच्या चेहऱ्यावर ना गमावल्याचा खेद होता, तर ना जिंकल्याचा उन्माद. म्हणूनच नाशिक दौऱ्यातील त्यांच्या ज्या लढती झाल्या त्यातून ते शिकत होते. नवे काही तरी वेचत होते. जी थाई संघाची भूमिका होती, तीच उत्तर महाराष्ट्राच्या संघांचीही असेल. किमान यजमान नाशिकच्या संघाला यातून ऊर्जा मिळाली तरी हा दौरा नाशिककरांसाठी तरी यशस्वी झाला असं म्हणायला हरकत नाही.
नाशिकमध्ये थायलंड संघाचं स्वागत होताना सामान्य नाशिककरांच्या चेहऱ्यावर मात्र काहीशा कुतूहलाच्या छटा पसरलेल्या होत्या. थाई संघाच्या अप्रतिम कौशल्याने हे कुतूहल केव्हाच संपलं आणि नवं कुतूहल जागृत झालं. ते म्हणजे उत्तर महाराष्ट्रातले संघ आता या संघांसोबत कसा सामना करतील? भारतीय मातीतले खेळ मॅटवर आल्यानंतर खरं तर त्यावर खेळण्याचं कुतूहल जसं खेळाडूंना असतं, तसं प्रेक्षकांनाही. एअर इंडिया, देना बँकेसह उत्तर महाराष्ट्रातील नाशिक शहर, नाशिक ग्रामीण पोलिस संघ, नंदुरबार संघांचा समावेश असलेली राज्यस्तरीय स्पर्धा रंगतदार झाली. या स्पर्धेत कोण जिंकले कोण हरले, याचा हिशेब नव्हता. नाशिक संघाची कामगिरी कशी झाली यालाही महत्त्व नव्हतं. महत्त्व होतं, ते फक्त अनुभव आणि मॅटवरील कौशल्याला.
थाई लोकांचं खेळाशी नातं घनिष्ठ आहे. मुय थाई हा कराटेमधील मार्शल आर्टचा क्रीडा प्रकार थायलंडचा राष्ट्रीय खेळ आहे. आग्नेय आशियातील या देशाच्या संघाविषयी खूप अप्रूप वाटण्याचं काहीही कारण नाही. तो मुळातच कबड्डीला बऱ्यापैकी सरावला आहे. या संघाचे प्रशिक्षकच कोल्हापूरचे रमेश भेंडीगिरी आहेत. खेळात कौशल्याचीच भाषा असते हे भारतीय प्रशिक्षकांनी थायलंडमध्ये सिद्ध केले. त्यामुळे थाई शैलीत भारतीय कौशल्याचं मिश्रण इतकं एकजीव झालं आहे, की भारतीय आणि थाई संघात फारसा फरक जाणवणार नाही. मात्र, थायलंडचे संघ मॅटला इतके सरावलेले होते, की दिवसभरात दोन सामने खेळल्यानंतरही एकाही खेळाडूला इंज्युरीने ग्रासलेले आढळले नाही. याउलट इतर संघांचे एक-दोन खेळाडू जायबंदी झालेले नक्कीच आढळले. आर्टिलरीचा संघच काय तो अपवाद ठरला. हा महत्त्वाचा फरक थाई आणि भारतीय संघांमध्ये स्पष्टपणे जाणवला.
थाई संघाकडे कमालीचा फिटनेस होता. कौशल्यापेक्षाही फिटनेस किती महत्त्वाचा आहे, हे थाई संघाने दाखवून दिलं. थायलंडच्या महिला संघाने दाखविलेले कौशल्य भारतासाठी भविष्यात धोक्याची घंटा आहे. उत्तर महाराष्ट्रातील कबड्डीने किमान फिटनेसकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. कारण आपल्याकडे ‘प्रॅक्टिस टाइप’ कबड्डी आहे. ते तुम्हाला फिटनेस देऊ शकत नाही. सकाळी आणि सायंकाळी अशा दोन्ही सत्रांत या संघाचं फिटनेस सेशन स्वतंत्र असतं. आपल्याकडे सायंकाळी मैदानावर हजेरी लावण्यापासून तक्रारी असतात! असं असलं तरी आंतरराष्ट्रीय दर्जा सिद्ध करू शकतील असे खेळाडू नाशिकच्या संघात आहेत, हे थायलंडच्या प्रशिक्षकांनीही हेरले. मात्र, त्यासाठी अशा खेळाडूंचा फिटनेस अत्यंत महत्त्वाचा आहे.
नाशिकच्या मंत्रभूमीत थायलंडचा दौरा आयोजित करणे अत्यंत खर्चिक आणि तितकंच जोखमीचंही होतं. मात्र, कबड्डी संघटनेचे अध्यक्ष अॅड. उत्तमराव ढिकले, आमदार जयंत जाधव, आमदार वसंतराव गिते यांनी पुढाकार घेतल्याने थायलंडचा दौरा यशस्वी होऊ शकला. मात्र, यामुळे क्रीडा क्षेत्राला सुगीचे दिवस आणण्याची जबाबदारीही वाढली आहे. नाशिकच्या पुरुष संघाने १९८५ मध्ये मनमाडला राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत उपउपांत्य फेरी गाठली होती. आतापर्यंत ही सर्वोच्च कामगिरी होती. त्यानंतर सांगलीतील यंदाच्या ५९ व्या राज्यस्तरीय स्पर्धेत संघाने सहाव्या क्रमांकावर मजल मारली आहे. मात्र, सातत्य नसल्याने नाशिकच्या कबड्डीची पीछेहाट होत आहे. थायलंडच्या दौऱ्याने नाशिकमध्ये कबड्डीचं वातावरण समृद्ध व्हावं हीच अपेक्षा आहे. महिला संघाचा सुवर्णकाळ पुन्हा परतून यावा, नाशिकच्या पुरुष कबड्डीने नवा इतिहास लिहावा या उदात्त अपेक्षा बाळगणे गैर नाही. त्यामुळे आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविताना नाशिकच्या संघटनेला हा खेळ आणखी वाढविण्याचेही आव्हान आहे.


थायलंड दौऱ्याने नाशिकच्या कबड्डीला चांगला अनुभव मिळाला आहे. मॅटवर खेळण्यासाठी फिटनेस आवश्यक आहे. मात्र, तो कसा असावा याचा आदर्श थाई संघाने दिला. क्रीडाधोरणामुळे महापालिकेकडून अपेक्षा वाढल्या आहेत. किमान कबड्डीला सुविधा मिळाव्यात एवढीच अपेक्षा आहे.
- प्रशांत भाबड, सरकार्यवाह, नाशिक जिल्हा कबड्डी संघटना
Published on Maharashtra Times 18 August 2014

Comments

Powered by Blogger.

About Me

My photo
Hello friends I am Mahesh Pathade. I have been working as a Senior Copy Editor in Maharashtra Times newspaper. I have 15 years of experience in journalism. I have worked in newspapers in Nashik, Jalgaon etc. I have experience working in major newspapers like Sakal News papers group, Dainik Bhaskar Group, Times of India group. Sports is my favorite. Along with sports, I have written extensively on film and literature. Sports review is my favorite. I have interviewed many international players. Interviews by several players including Hindakesari wrestler Maruti Mane, International hockey player Dhanraj Pillay, cricket fan Sudhir Gautam Chaudhary, Grandmaster Pravin Thapse, Vidit Gujrathi and others have been featured. I have International FIDE rating in the game of Chess.