सरांचं गणित चुकलं...!

Pimpalgaon baswant school and college

पिंपळगाव हायस्कूलचे शिक्षक व्ही. आर. जाधव यांचे नुकतेच निधन झाले. त्यानिमित्त त्यांना वाहिलेली ही शब्दफुले...
kheliyad.sports@gmail.com
M. +91 80875 64549
      www.linkedin.com/in/maheshpathade03    

‘गणित शिकायचं तर गणिताचा सराव करा...’ अशी साधी नि सिंपल मांडणी करणारे व्ही. आर. जाधव सर. इटलीचा थोर गणितज्ञ गॅलिलिओ गॅलिली याने फार पूर्वीच हे विचार मांडले होते. The only way to learn mathematics is to do mathematics. म्हणजे गणित शिकायचे असेल तर एकच मार्ग आहे तो म्हणजे गणिताचा अभ्यास करा! पण त्या वेळी आम्हाला हा गॅलिलिओ अजिबात कळला नव्हता.. आम्हाला कळले ते जाधव सर. आम्ही आधी जाधव सरच वाचले, नंतर आम्हाला गॅलिलिओ समजला. गॅलिलिओने चंद्रावरचेही दिसू शकेल अशा दुर्बिणीचा शोध लावला. मला वाटतं, की जाधव सरांचं आम्ही पूर्वीच गंभीरपणे ऐकलं असतं तर गॅलिलिओपेक्षाही लांब पाहू शकणारी दुर्बिण आम्ही शोधली असती. इतकी, की आम्ही सरांच्या दिशेने झेपावणाऱ्या काळालाही पाहू शकलो असतो आणि त्याला आम्ही दूर पिटाळून लावलं असतं... पण छे! ही न सुटणारी गणितं!!!
गॅलिलिओ थोर तत्त्वज्ञ, गणितज्ञ, तर जाधव सर नवा गॅलिलिओ शोधणारे शिक्षक. कारण गॅलिलिओच्या मनात का सतत जागा होता. म्हणून ते शास्त्रज्ञ झाले. जाधव सरांच्या मनातही हा का किंबहुना तेवढाच जागा होता. आम्ही एकाच एरियात म्हणजे शिवाजीनगरमध्ये राहायचो. आम्ही गणेशोत्सवाची वर्गणी मागायला जायचो तेव्हा सरांच्या मनातला ‘का’ जागा व्हायचा. ते अनेक प्रश्न विचारायचे. अनेक मंडळं वर्गणी मागतात, कोणाकोणाला द्यायची? बरं मग ती अमुकच रकमेची का? आम्ही देऊ तेवढीच वर्गणी घ्यायची, तो आमचा अधिकार वगैरे वगैरे... त्या वेळी खरंच वीट यायचा. पण सर बरोबर होते हे खूप नंतर कळलं. आता नाशिकमध्ये प्लॅटसंस्कृतीत वावरताना वर्गणी मागायला येणारे पाहिले, की आमच्याही मनात जाधव सर डोकावून जातात.
सरांकडे आम्ही ट्यूशनला जायचो. ते गणित अप्रतिम शिकवायचे. त्या वेळी गणित शिकविणाऱ्यांची मोठी फळी होती. सगळेच उत्तम शिक्षक होते. सर गणित शिकवायचे तेव्हा समजले की नाही म्हणून आमच्यासमोर कंबरेवर हात ठेवून विठ्ठलासारखे उभे राहायचे. आणि म्हणायचे, ‘‘समजले का?’’ आम्ही गणिताच्या पंढरीत आलेले वारकरी ‘होऽऽऽ’ म्हणायचो. माझं गणित फारसं पक्क नव्हतं; पण तरीही गणिताविषयी आवड निर्माण झाली ती जाधव सरांसारख्या शिक्षकांमुळे. मी गणित सोडवायचो, पण बऱ्याचदा चुकायचं. कुठल्या पायरीवर आमच्या अंकांची अदलाबदल व्हायची काही कळायचं नाही. नंतर जे उत्तर यायचं त्याचा प्रत्यक्ष उत्तराशी काडीचाही संबंध नसायचा; पण कधी कधी बरोबरही यायचं. जसं एखाद्या चित्रपटाच्या सुरुवातीलाच सांगितलं जातं, की या कहाणीशी कुठे साधर्म्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा, तसा काहीसा योगायोग यायचा! हे कशामुळे व्हायचं, तर ते गणिताचा सराव न केल्यामुळे... हे सरांचं वाक्य आजही मी गॅलिलिओच्या वाक्याशी जुळवून पाहतो. नंतर सरांमुळेच गणित चांगलं झालं. आता सोडवतोय आयुष्याची गणितं रोज. त्यात बेरजेची गणितं फारच सोपी झालीत. अर्थात, मी तरी सरांचं गणित ‘मू्ल्याधिष्ठित’ मानलं; ‘मार्काधिष्ठित’ अजिबात नाही.
मुले नोकरीनिमित्त अन्य शहरांत स्थायिक झाली, तेव्हा त्यांची अर्धांगिणी सावलीसारखी त्यांच्यासोबत राहिली. त्याही शिक्षिकाच. आम्हा छोट्या छोट्या जिवांना त्या जीवशास्त्र शिकवायच्या. जाधव सरांचं बेरजेचं गणित, तर त्यांचं एकजीव होण्याचं शास्त्र. गणिताशिवाय विज्ञानाचा विचार करणे अशक्य आहे हे समजून सांगायचं असेल तर मी पटकन या जाधव दाम्पत्याचं उदाहरण देऊन मोकाळा होईन. असं हे या दाम्पत्याचं समृद्ध सहजीवन. पण काय कोण जाणे हे समृद्ध सहजीवन अचानक दुभंगलं. ऐन दिवाळीत दिवेलागण होत असताना एक दिवा मिणमिणता झाला आणि कायमचा विझला. आयुष्यात नेहमी बेरजेचं गणित शिकवणाऱ्या सरांनी स्वतःला मात्र आयुष्याच्या गणितातून कायमचं वजा केलं. पण मी या वेळी धाडसाने म्हणेन, सर, या वेळी तुम्ही गणित चुकले! हो खरंच चुकले. वजाबाकीत बाकी शून्य यायला हवी होती. सर, बाकी शून्य आलीच नाही!! आणि तुमच्यात एकजीव झालेला तो एक जीव बेरजेशिवायच राहिला!!!

Comments