Kheliyad

Advertisement
Diwali Spacial 2019

Jagmohan to Jagjit singh (part 5) : भारत सरकारने घातली होती जगजितसिंग यांच्या गझलांवर बंदी!

November 01, 2019 · · comments

jagjit singh ghazal songs
भारत सरकारने घातली होती जगजितसिंग यांच्या गझलांवर बंदी!



kheliyad.sports@gmail.com
M. +91 80875 64549
      www.linkedin.com/in/maheshpathade03    

चित्रा यांच्या वैवाहिक आयुष्यात एक वादळ आलं. त्यांचे पती देबू दत्ता यांनी दुसऱ्या लग्नाचा निर्णय घेतला. हा चित्रा यांना मोठा धक्का होता. चित्रा यांना हे सहन होण्यापलीकडचं होतं. त्यामुळे एके दिवशी चित्रा यांनी निमूटपणे घटस्फोटावर सह्या केल्या आणि मुलगी मोनिकासोबत पतीचे घर सोडले. सुखवस्तूत रमलेल्या चित्रा आता एका खोलीच्या लहानशा फ्लॅटमध्ये राहू लागल्या. आयुष्य आता वेगळ्या वळणावर येऊन ठेपलं होतं. तो 1968 चा एप्रिल महिना होता. अर्थात, असा प्रसंग कधी वाट्याला येईल, असं त्यांना स्वप्नातही वाटलं नव्हतं. मात्र, हे कटू सत्य चित्रा यांनी स्वीकारलं. त्यानंतर चित्रा जगजितसिंग यांना सप्टेंबर 1968 मध्ये भेटल्या, जेव्हा ते रेकॉर्डिंगला आले होते. मात्र, जगजितसिंग यांच्या मनात एक गोष्ट कायमची घर करून राहिली, ती म्हणजे चित्रा यांना आपला आवाज अजिबात आवडत नाही ते काहीअंशी खरंही होतं! त्या वेळी चित्रा यांना तलत मेहमूद यांचा मखमली आवाज कमालीचा आवडायचा. त्यात जगजितसिंग यांचा आवाज त्यांच्या आवाजाशी अजिबात मेळ खात नव्हता. त्यांच्या मनात एकच सुरू होतं, की चित्रा यांना कसं इम्प्रेस करावं म्हणजे त्या आपल्या आवाजाला दाद देतील. त्यामुळे त्यांनी एक मार्ग निवडला, तो म्हणजे तलत मेहमूद यांच्यासारखं गाण्याचा रियाज करणे. त्यामुळे ते तलत मेहमूद यांचे गाणे दिवसरात्र गुणगुणत राहायचे...

सीने में सुलगते हैं अरमां
आँखों में उदासी छाई है
ये आज तेरी दुनिया से हमें
तक़दीर कहाँ ले आई है
सीने में सुलगते हैं अरमां


जगजित आणि त्याच्या मित्रांनी मिळून रेन्बो म्युझिक या नावाने एक ऑर्केस्ट्रा ग्रुप बनवला होता. य़ा ग्रुपमध्ये चित्राही होत्या. ईदमध्ये त्यांना आफ्रिकेला जाण्याचा प्रस्ताव आला. मग जगजित आणि चित्रासह रेन्बो म्युझिक ग्रुप आफ्रिकेला रवाना झाला. त्या वेळी जगजितसिंग चित्रपटगीतेच अधिक गात होते. आफ्रिकेतून परतले तर नव्या अडचणीत सापडले. त्या वेळी रंगभेदामुळे आफ्रिका वेगळा पडला होता. भारतानेही त्या देशाशी कोणतेही संपर्क न ठेवण्याचे धोरण अवलंबले होते. असे असतानाही जगजितसिंग यांचा ग्रुप तेथे मैफली घेतोच कसा, असा बाका प्रसंग उभा ठाकला. मात्र, ते जगजितसिंग यांना कुठे माहीत होतं! जगजितसिंग आणि त्यांचा ग्रुप मायदेशी परतला तेव्हा सर्वांचे पासपोर्ट जप्त करण्यात आले. एवढेच नाही, तर आकाशवाणीवर जगजितसिंग यांच्या गझलांवर बंदी घालण्यात आली.
jagjit singh ghazals
Jagjit singh life story

या घटनेच्या बऱ्याच कालावधीनंतर हा तिढा सुटला. या आफ्रिका दौऱ्यात जगजित आणि चित्रा यांनी एकमेकांना जाणून घेतलं होतं. नव्या नात्याचे बीज रोवले गेले होते. अखेर एक दिवस असा आला, की पंजाबने बंगालसमोर एक प्रस्ताव (प्रपोज) ठेवला.

जगजितसिंग यांनी घातली चित्रा यांना मागणी

अर्थात चित्रा यांना मागणी घालणंही गमतीदार होतं. त्या वेळी चित्रा किचनमध्ये स्वयंपाक करीत होत्या. त्याच वेळी दरवाजावर टक टक आवाज आला. दरवाजा उघडला तर जगजितसिंग समोर उभे. त्यांची अवस्था खूपच विचित्र होती. चेहरा पडलेला. अतिशय जर्जर अवस्थेत ते होते. त्यांना धड बोलताही येत नव्हतं. घरात आले नि थेट किचनमध्येच जाऊन बसले. चित्रा यांच्या लक्षात आलं, की जगजित तापाने फणफणत आहेत.  

चित्रा त्यांना म्हणाल्या, "तुम्ही जरा वेळ बसा. मी तुम्हाला गरम पाणी करून देते. तुम्ही त्याची वाफ घ्या."

चित्रा यांनी टॉवेल दि्ला. तो टॉवेल डोक्यावर टाकून ते वाफ घेत होते. चित्रा पाठमोऱ्या उभ्या होत्या. काही तरी भाजीपाला कापत होत्या. त्याच वेळी त्यांना जगजितसिंग म्हणाले, "मला तुझ्याशी लग्न करायचंय."

चित्रा चकित झाल्या. म्हणाल्या, "काय? हे काय नवीन..? माझं लग्न झालेलं आहे."

जगजितसिंग म्हणाले, "मी तुझ्या होकाराची वाट पाहीन."

चित्रा काहीशा हैराण झाल्या. कारण जेव्हा जगजितसिंग यांनी प्रपोज केलं, तेव्हा चित्रा यांची केवळ मैत्रीच होती. मग लग्नाचा विषय कसा काय आला? कोणतेही कनेक्शन नव्हतं. चित्रा तशा फ्रेंडली होत्या. त्यांचे पतीही जगजितसिंग यांना म्हणायचे, तुला जेव्हा वाटेल तेव्हा तू ये. जेवण कर, पाहिजे तेव्हा राहा. हे सगळं होतं. जगजितसिंगही येत होते. इतरही अनेक जणांचा राबता होता. ते कॅरम खेळायचे, पत्ते खेळायचे. त्यापैकीच एक जगजितसिंग होते. तो एक फॅमिली फ्रेंड झालेला होता. बस एवढाच जगजितसिंग यांच्याशी चित्रा यांचा परिचय होता. आता अचानक दुसऱ्या लग्नाचा प्रस्ताव आल्याने त्या काहीशा द्विधा मनःस्थितीत सापडल्या. कारण नुकताच घटस्फोट झाला होता आणि मुलगीही मोठी होत होती. दुसऱ्या लग्नामुळे तिच्यावर काय परिणाम होईल, याची तिला जास्त चिंता होती. चित्रा यांची स्वतःशीच एक लढाई सुरू होती. त्यामुळे त्यांनी जगजितसिंग यांना टाळलं. अर्थात, या नकारामुळे त्यांच्या मैत्रीत मात्र कटुता कधी आली नाही. हळूहळू या मैत्रीने एक जबाबदारीही पेलली होती. एका तरुण महिलेनं एकटं राहणं, त्या काळी भयंकर जोखमीचंही होतं मुळी. या एकटेपणात चित्रा यांना भक्कम आधार दिला असेल तर तो जगजितसिंग यांनी. घरातला बल्ब बदलण्यापासून मुलगी मोनिकाची काळजी घेण्यापर्यंत ते चित्रासोबत राहिले. मोनिकासाठी ते 'जगजितकाकू' होते. हे सगळं चित्रा यांना कळत नव्हतं असं नाही; पण ते त्या शांतपणे पाहत होत्या. त्यांना जाणवलं, की आपण आता आयुष्यात आणखी जोखीम घेऊ शकत नाही. काळ कापरासारखा उलटत होता.



ना बँडबाजा, 30 रुपयांत केलं लग्न!

दोन वर्षांनी जगजितसिंग यांनी पुन्हा विवाहाचा प्रस्ताव ठेवला. या वेळी चित्रा त्यांना नकार देऊ शकल्या नाहीत. विवाहाला अखेर ग्रीन सिग्नल मिळाला. लग्नाची तयारी सुरू झाली. मित्रमंडळींना माहिती देण्यात आली. वडिलांच्या मनात जगजित यांच्याविषयी अजूनही नाराजी होती. त्यामुळे लग्नात त्यांची कोणतीही भूमिका नसेल, यात शंका नव्हती. दोघांनी निश्चित केलं, की मंदिरात साध्या पद्धतीने लग्न करायचं. कारण धूमधडाक्यात लग्न करण्याचं त्यांचं अजिबात बजट नव्हतं. अखेर 1970 मध्ये भारतातील या दोन ताऱ्यांनी अवघ्या 30 रुपयांत लग्न उरकलं!

प्रसिद्ध गायक भूपेंद्र याच मित्रमंडळींमध्ये होते. त्यांनी दोन हार आणले. जगजित यांचा तबलावादक हरीश यांनी अर्धा किलो मिठाईचा बॉक्स आणला. पंडितजींनी फेरे घालण्यास सांगितले आणि पाच मिनिटांत लग्न उत्साहात संपन्न. ना बँडबाजा, ना बारात, ना धूमधाम, ना रिसेप्शन. दोन वेगवेगळ्या मार्गांवरचे प्रवासी आता एकाच नावेत बसले होते. त्या वेळी कोणीही कल्पना केली नसेल, की ही जोडी भारतातील कोट्यवधी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवेल.

आता जिंगल स्टार चित्रा यांना जगजितसिंग यांच्या रूपाने पतीच नाही, तर गुरूही मिळाला होता. चित्रा यांना हिंदी आणि बंगाली बोलता येत होती, समजत होती आणि गाताही येत होतं. मात्र, गझलविश्वात उर्दूची समज अत्यंत आवश्यक होती. जगजितसिंग यांनी त्यांचं उर्दूशीही नातं जोडलं. चित्रा यांच वैशिष्ट्य होतं, की एकदा लक्षपूर्वक ऐकलेलं त्या तंतोतंत कॉपी करीत होत्या. लग्नानंतर काही दिवस भटकण्यात गेले. नंतर दोघेही रोजीरोटीचा जुगाड करण्यात व्यस्त झाले. त्या काळात ब्रिजनारायण नावाचे व्यक्ती होते. संगीत रसिक आणि जाणकार होते. तेथील रंगभवनात ते दरवर्षी 'एक श्याम गझल के नाम' करायचे. याच गझल कार्यक्रमातून या जोडीचा शुभारंभ झाला. दोघांनी दोनच गझला सादर करीत संपूर्ण मैफल लुटली.

जगजित-चित्रा जोडीचे खुललं भाग्य...

1971 हे वर्ष जगजितसिंग यांच्यासाठी दोन गोड बातम्या घेऊन आलं. जानेवारी 1971 मध्ये चित्रा यांचा पहिला अल्बम मार्केटमध्ये आला आणि ऑगस्टमध्ये नवा पाहुणा आला. विवेक त्याचं नाव. पहिला अल्बम उभयतांच्या आयुष्यातला यादगार ठरला. पुढे झालं काय, की गझल कार्यक्रम संपल्याबरोबर एचएमव्हीचे अधिकारी या जोडीला भेटले. ते अधिकारी होते जी. एन. जोशी. संगीताचे उत्तम जाणकार होते. त्यांनी दोघांचेही कौतुक केले आणि नव्या रेकॉर्डिंगचे आमंत्रणही दिले. ते म्हणाले, मी मार्चमध्ये रिटायर्ड होतोय. त्याच्या आधी या मुलाचं (जगजितसिंग) रेकॉर्डिंग करण्याची माझी इच्छा आहे. त्या वेळी दोघांनाही खूप आनंद झाला. कारण अशी भली माणसं आजकाल कुठे मिळतात?

जगजित आणि चित्रा त्यांना स्टुडिओत भेटायला गेले. तेव्हा असं ठरलं, की खय्याम यांच्यावर संगीताची जबाबदारी सोपवली जावी. खय्याम यांनी ती स्वीकारलीही, पण काळ उलटत गेला. खय्याम काही आले नाहीत. स्टार लोकांचं असंच लहरी काम असतं. त्यामुळे रेकॉर्डिंग होऊ शकलं नाही. शेवटी जगजितसिंगच म्हणाले, ''मी हे करू शकतो.'' जोशी खूश झाले. ते म्हणाले, ''ही तर खूप चांगली गोष्ट आहे.'' 

जगजितसिंग यांनी चार गाणी कंपोज केली. त्यापैकी एक गाणं अतिशय गाजलं. ते म्हणजे...

वो जो हम में तुम में क़रार था 
तुम्हें याद हो कि न याद हो

पुढे जगजितसिंग यांच्या मित्रमंडळींमध्ये आणखी वादकांची भर पडली. ते रोज तासन् तास रियाज करीत होते. चित्रा यांच्यासाठी तो एक अविस्मरणीय काळ होता. त्या जगजितसिंग यांच्याकडून संगीताचे बारकावे शिकत होत्या.

सीर्फ शबनम ही शान-ए-गुलिस्ताँ नहीं
शोला-ओ-गुल का भी दौर चलता रहे
अश्क भी चश्म-ए-पुरनम से बहते रहे
और दिल से धुआँ भी निकलता रहे

चित्रा यांच्या आवाजातली मिठास काही औरच होती! एकट्या गात राहिल्या, की त्यांच्या आवाजात सहजता असायची; पण जगजितसिंग यांच्यासोबत गायला बसल्या, की ते त्यांच्यासाठी एक आव्हान असायचं. जगजितसिंग यांना ऐकणाऱ्यांच्या मूडची विलक्षण समज होती. म्हणजे त्यांनी एक प्रकारे रसिकांची नाडी ओळखली होती. त्यांना हे कळायचं, की चित्रा यांच्या आवाजातला कोणता रंग दाद मिळवून जाईल. ही जोडी कमालीची हिट होत गेली. दोन वर्षांनी त्यांचा आणखी एक अल्बम- 'सुपर सेव्हन' आला. या अल्बममधील गझल लोकं आजही गुणगुणतात...

जब भी आती है तेरी याद कभी शाम के बअ'द 
और बढ़ जाती है अफ़्सुर्दा-दिली शाम के बअ'द 

ही जगजितसिंग यांची 'सुपर सेव्हन'मधील आवडती गझल. दोघांचेही सूर छान जळले होते. घरचीही आर्थिक घडी सुधारत होती. जगजितसिंग यांनी पैशांची बचत करीत घरी मनिऑर्डर करणे सुरू केले होते. वडिलांची नाराजीही हळूहळू दूर होत गेली. मुलाचा आवाज रेडिओवर ऐकताना त्यांना कमालीचे कौतुक वाटायचे. डोळ्यांत आनंदाश्रू तरळायचे. जगजित यांच्या उदरनिर्वाहाचे माध्यम म्हणजे पार्टी, लाइव्ह शो आणि संगीत मैफिली. दुसरीकडे चित्रा यांनीही जिंगल गायन सोडलेले नव्हते. त्यांचे विदेश दौरेही वाढले होते. गंगानगरचा खोडकर तरुण व्यावसायिक गायक होत होता. मायानगरी तर त्यांच्यासाठी कार्पेट अंथरुणच बसली होती.



एके दिवशी एचएमव्हीकडून रेकॉर्डिंगचा नवा प्रस्ताव आला. त्या वेळी रेकॉर्डिंगमध्ये एचएमव्हीशिवाय दुसरी कंपनीच नव्हती. ते म्हणाले, की तुम्ही एलपी रेकॉर्डिंग करा. जगजितसिंग यांना इपीचा तसाही दहा वर्षांचा अनुभव होताच. मात्र, तरीही त्यांना त्या योग्यतेचे समजले जात नव्हते, की ते एलपी रेकॉर्डही करू शकतील. दहा वर्षांनंतर जगजित- चित्रा यांना ही संधी मिळाली. त्यात या दोघांचा पहिला धमाकेदार अल्बम आला- 'दि अनफॉरगेटेबल्स'. भारतीय आणि पश्चिमी यंत्रांचा अनोखा संगम या अल्बममध्ये होता. या अल्बमने या जोडीला एका रात्रीत स्टार बनवले. भारतीयांनी अनुभवलं, की कशा प्रकारे श्रीमंतांच्या मैफिलीतून सामान्य माणसाच्या घरात गझल पोहोचली होती. हा 1976 चा काळ होता. 

या अल्बममध्ये जगजित यांनी एक हिट नज्म गायली. ती म्हणजे...

बात निकलेगी तो फिर दूर तलक जायेगी
लोग बेवजह उदासी का सबब पूछेंगे

Next 6 th part here
Jagmohan to Jagjit singh (part 6) : जगजितसिंग यांना 70 च्या दशकात मिळाली होती 80 हजारांची रॉयल्टी
(क्रमशः)

Comments

Powered by Blogger.

About Me

My photo
Hello friends I am Mahesh Pathade. I have been working as a Senior Copy Editor in Maharashtra Times newspaper. I have 15 years of experience in journalism. I have worked in newspapers in Nashik, Jalgaon etc. I have experience working in major newspapers like Sakal News papers group, Dainik Bhaskar Group, Times of India group. Sports is my favorite. Along with sports, I have written extensively on film and literature. Sports review is my favorite. I have interviewed many international players. Interviews by several players including Hindakesari wrestler Maruti Mane, International hockey player Dhanraj Pillay, cricket fan Sudhir Gautam Chaudhary, Grandmaster Pravin Thapse, Vidit Gujrathi and others have been featured. I have International FIDE rating in the game of Chess.