शतकांचे महाशतक किती कठीण होते सचिनसाठी?
![]() |
| Sachin Tendulkar 100th century |

Sachin Tendulkar 100th Century | मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या शतकांच्या महाशतकाला 16 मार्च रोजी आठ वर्षे झाली. या शतकांच्या महाशतकाकडे पाहिलं तर त्याच्यासाठी हा अतिशय अवघड टप्पा होता. कदाचित तो या शतकांच्या महाशतकापासून वंचितही राहिला असता. सचिनने आठ वर्षांपूर्वी शेर-ए-बांग्ला स्टेडियममध्ये ही ऐतिहासिक कामगिरी केली होती. मात्र, या महाशतकी शतकासाठी त्याला एक वर्ष आणि चार दिवस वाट पाहावी लागली होती.
सचिनने अनेक शतके लीलया केली आहेत. त्यासाठी त्याला वाट पाहण्याची कधी गरज भासली नाही. मात्र, हे पहिलेच शतक होते ज्याला गवसणी घालण्यासाठी त्याला एक वर्ष वाट पाहावी लागली. अर्थात, सचिनला यापूर्वीही एका शतकासाठी 315 दिवस वाट पाहावी लागली होती. मात्र, शंभराव्या शतकापर्यंत पोहोचण्यासाठी सचिनला जो मोठा कालावधी लागला तो क्रिकेटविश्वात चर्चेचा विषय ठरला. त्यावरून तो अनेकांच्या टीकेचेही लक्ष्य बनला. त्यामुळेच हे शतक त्याच्यासाठी सर्वांत कठीण शतक मानले जाते. त्याला कारणेही तशीच आहेत.
आशिया कप स्पर्धेत 16 मार्च 2012 रोजी भारताचा अंतिम सामना बांग्लादेशविरुद्ध होता. ढाक्यातील शेर-ए-बांग्ला स्टेडियममध्ये हा सामना होता. हा सामना क्रिकेटविश्वासाठी दोन कारणांसाठी महत्त्वाचा होता. एक तर आशिया कप स्पर्धेचा अंतिम सामना होता, तर दुसरे म्हणजे 99 शतकांचा बादशाह सचिन तेंडुलकर आपले शंभरावे शतक पूर्ण करण्याच्या ईर्षेने खेळणार का, याचीही उत्सुकता होती. सचिनने चाहत्यांना निराश केले नाही. त्याने 114 धावांची शतकी खेळी रचत शतकांचे महाशतक साजरे केले आणि चाहत्यांनी सुटकेचा निःश्वास टाकला.
''हे माझ्या सर्वच शतकांमध्ये सर्वांत कठीण शतक होते. कारण मी कुठेही गेलो तर लोक याच विषयावर चर्चा करायचे. कोणीच माझ्या ९९ शतकांविषयी बोलत नव्हते.''
अर्थात,. सचिनने आपले 99 वे शतक 12 मार्च 2011 रोजी विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झळकावले होते. त्यानंतर त्याला सहा वेळा शतक करण्याची संधी होती. शतकाजवळ पोहोचूनही त्याला शतकाने हुलकावणीच दिली. दोन वेळा तर तो 'नर्व्हस नाइंटीज'चा शिकार झाला. 2011 च्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध मोहाली येथे उपांत्य फेरीचा सामना होता. त्या वेळी तर क्रिकेटप्रेमींच्या हृदयाची ठोके कमालीची धडकत होती. का नाही धडकणार, कारण त्या वेळी सचिन 85 धावांवर होता. शतकाला अवघ्या 15 धावांची गरज होती. समोर सईद अजमल गोलंदाजी करीत होता. त्याच्या एका चेंडूवर चेंडू हवेत उडाला आणि शाहीद आफ्रिदीने तो झेप घेऊन झेल टिपला. पुढे तंदुरुस्तीच्या कारणास्तव सचिनला वेस्ट इंडीज दौरा करता आला नाही. मात्र, इंग्लंड दौऱ्यात त्याला शतक झळकावण्याची नामी संधी होती. इग्लंडविरुद्धच्या या मालिकेत राहुल द्रविडवगळता कुणीच खेळपट्टीवर टिकू शकलं नाही. सचिनलाही केवळ ओव्हलच्या मैदानावरच लय सापडली. सामन्याच्या चौथ्या दिवशी सचिन 35 धावांवर खेळत होता. पाचव्या दिवशी त्याने केव्हिन पीटरसनला खणखणीत चौकार ठोकत नव्वदीपार खेळी साकारली. त्या वेळी तर चाहत्यांचे चेहरे खुलले होते. सर्वांच्या मनात महाशतकाने उचल खाल्ली. मात्र, सचिनच्या दुर्दैवाचा फेरा संपलेला नव्हता. त्याच वेळी टिम ब्रेस्ननचा चेंडू असा आला, की तो पायावर आदळला. सचिन पायचीत झाला आणि पुन्हा एकदा तो नर्व्हस नाइंटीजचा शिकार होत महाशतकापासून वंचित राहिला. घरच्या मैदानावरही सचिनला महाशतकाने हुलकावणीच दिली. त्या वेळी वेस्ट इंडीज भारत दौऱ्यावर आला होता. दिल्लीतील एका सामन्यात 76, तर मुंबईतल्या घरच्या मैदानावर 94 धावांवर तो बाद झाला. त्यानंतर भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया दौरा केला. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने तर त्याच्या शतकांच्या महाशतकाच्या सन्मानार्थ एक विशेष ट्रॉफी तयार केली होती. सचिन जेथे खेळायला जायचा तेथे ही ट्रॉफी ठेवली जायची. मात्र, ऑस्ट्रेलिया दौऱ्यातही सचिनची निराशा झाली. त्याने मेलबर्न (73) आणि सिडनी (80) येथेही त्याने महाशतकाची आशा जागवली.
अखेर आशिया कप त्याच्यासाठी एक संधी घेऊन आला. बांग्लादेश दौऱ्यावर या वेळी सचिन आपली हेअर स्टाइलही बदलली होती. हा बदल त्याचे शतक आणि अंधश्रद्धेशी जोडला गेला होता. श्रीलंकेविरुद्ध सचिन केवळ सहा धावांवर बाद झाला. मात्र, बांग्लादेशविरुद्ध तो खेळपट्टीवर टिकून राहिला आणि याच चिकाटी खेळीमुळे त्या शतकांचे महाशतक साकारले. क्रिकेटच्या इतिहासात हे शतक अजरामर झाले. हा तो दिवस होता, ज्या वेळी तत्कालीन अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी लोकसभेत अर्थसंकल्प सादर केला होता. मात्र, सायंकाळपर्यंत या अर्थसंकल्पापेक्षा सचिनच्या महाशतकाचा संकल्प पूर्ण झाल्याचीच चर्चा अधिक होती. ही पहिलीच अशी घटना होती, की अर्थसंकल्पावर सचिनचं महाशतक भारी पडलं होतं.
''नेहमीच खेळाचा आनंद घ्या. स्वप्नांचा पाठलाग करा. स्वप्न नक्कीच पूर्ण होतात. मी 22 वर्षे विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेची प्रतीक्षा केली आणि माझे स्वप्न पूर्ण झाले.''








सचिनच्या या महाशतकाचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.
ReplyDelete:-)
Delete