...तर बीसीसीआयला ४००० कोटींचा बसणार फटका
![]() |
| IPL 2020 postponed indefinitely |

IPL 2020 postponed indefinitely |
करोना विषाणूच्या महामारीमुळे प्रतिष्ठित विम्बल्डनसह जगभरातल्या क्रीडा स्पर्धा रद्द होत असताना आयपीएलबाबत मात्र बीसीसीआयने सावध पवित्रा घेतला. आधी १५ एप्रिलपर्यंत स्थगित केलेली आयपीएलच्या १३ व्या मोसमातील स्पर्धा लॉकडाऊन वाढवल्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने BCCI | १६ एप्रिल २०२० रोजी अनिश्चित काळासाठी स्थगित केली आहे. म्हणजेच रद्द नाही. ही स्पर्धा पुढेही होऊ शकते. अद्याप करोनाचे सावट निवळलेले नाही. पुढे ते केव्हा निवळेल याचीची शाश्वती नाही. अशातच जर ही स्पर्धा रद्द झाली, तर बीसीसीआयला BCCI | तब्बल चार हजार कोटींचे नुकसान सोसावे लागणार आहे. या व्यतिरिक्त खेळाडू, कंपन्या, फ्रँचाइजींना सोसाव्या लागणाऱ्या नुकसानीचा आकडा तर वेगळाच आहे. स्थगितीमुळेही नुकसान सोसणाऱ्या बीसीसीआयला आयपीएल रद्द झाल्यानंतर काय काय सोसावे लागू शकते यावर टाकलेला प्रकाशझोत...
जगातील श्रीमंत क्रीडा संस्थांपैकी एक असलेल्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला BCCI | आयपीएलमधून प्रचंड पैसा मिळत होता. क्रिकेटचे अनेक संदर्भ आयपीएलमुळे बदलले. एखाद्या नवोदित क्रिकेटपटूला राष्ट्रीय संघात स्थान मिळाले नसले तरी आयपीएल हाच एकमेव असा मार्ग होता, जेथे त्याच्या गुणवत्तेला किमान संधी मिळत होती. पैसाही मिळू लागला. आता आयपीएल अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आल्याने या स्पर्धेच्या भविष्यातील वाटचालीवरही परिणाम होणार आहे. ही स्पर्धा 29 मार्चपासून होणार होती. मात्र, करोना विषाणूच्या संसर्गामुळे ही स्पर्धा 15 एप्रिलपर्यंत स्थगित करण्यात आली. बीसीसीआयची एक अपेक्षा होती, की किमान एप्रिलच्या मध्यात ही महामारी किमान आटोक्यात येईल आणि आयपीएल पुन्हा होऊ शकेल. मात्र, जेथे संपूर्ण विश्वच कोविड १९ महामारीमुळे लॉकडाऊन झाले, तेथे ही स्पर्धा तरी कशी होणार? कारण आंतरराष्ट्रीय सीमाच लॉक झाल्याने विदेशी खेळाडूंचा भारतात येण्याचा मार्गही बंद झाला. अखेर ही स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याशिवाय पर्याय नव्हताच.
‘‘करोना विषाणूच्या महामारीमुळे जगभरात आरोग्य संकट उभे ठाकले आहे. अशातच लॉकडाऊन वाढविल्याने ही स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याशिवाय अन्य पर्याय नव्हता’’
- जय शहा, सचिव, बीसीसीआय
आयपीएलच्या नुकसानीबाबत बोलायचे झाले, तर बीसीसीआयला सुमारे चार हजार कोटींपेक्षा अधिक फटका बसण्याची शक्यता आहे. जर ही स्पर्धा रद्द झाली तर त्याचा पहिला फटका खेळाडूंना बसेल. संघाचे मालक खेळाडूंना वेतन देणार नाहीत. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे स्थानिक खेळाडू अडचणीत सापडतील. ही संपूर्ण व्यावसायिक स्पर्धा आहे. स्पर्धा असेल तरच पैसा. कारण व्यापारात फायदा आणि नुकसान या दोनच बाजूंचा विचार होतो. आयपीएलमध्ये ज्या उद्योजकांनी पैसा गुंतवला आहे, त्यांना त्यातून घसघशीत परताव्याची अपेक्षा असते.
![]() |
| आयपीएल रद्द झाल्यास असे सोसावे लागेल नुकसान Source : Bank of America securities BofA |
असे असते गणित
आयपीएलमध्ये खेळाडूंना वेतन देण्याची पद्धत कॉर्पोरेट आहे. म्हणजे स्पर्धा सुरू होण्याच्या एक आठवड्यापूर्वी खेळाडूंना १५ टक्के रक्कम दिली जाते. नंतर स्पर्धा सुरू झाल्यानंतर ६५ टक्के रक्कम दिली जाते. त्यानंतर उर्वरित २० टक्के रक्कम स्पर्धा संपल्यानंतर दिली जाते. सध्या तरी खेळाडूंना छदामही मिळालेला नाही. स्पर्धा स्थगित झाल्याने मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागणार असून, खेळाडूंच्या रकमेतून कपातही होऊ शकते, असे बीसीसीआय खेळाडू संघटनेचे अध्यक्ष अशोक मल्होत्रा यांनी म्हंटले आहे.स्टार इंडिया चॅनलचे नुकसान
आयपीएलमध्ये गुंतवणूक इतकी प्रचंड आहे, की सामान्य त्याची कल्पनाही करू शकत नाहीत. आता स्टार इंडिया चॅनलचेच उदाहरण घ्या, त्यांनी आयपीएलच्या टीव्ही आणि डिजिटल प्रसारणासाठी ३२६९.५० कोटींचे हक्क विकत घेतले होते. त्यासाठी या चॅनलने ६३४७.५० कोटी रुपये खर्च केले होते. म्हणजे एकपट हक्क विकत घेऊन जे चॅनल त्याच्या दुप्पट खर्च करू शकते, त्या चॅनलची कमाई किती प्रचंड असू शकते याची कल्पना येऊ शकते. ही गुंतवणूक २०१८ पासून २०२२ पर्यंतच्या हक्कांसाठी होती. आता ही स्पर्धा स्थगित झाल्याने स्टार इंडियाला प्रचंड मोठा फटका बसणार आहे. कारण या चॅनलला किती काळ हे नुकसान सोसून धरता येऊ शकेल यावर त्याच्या नुकसानीचा अंदाज करता येऊ शकेल.विवो कंपनीला ४०० कोटींचा फटका
आयपीएलमध्ये संघमालकांचे नुकसान किती, यापेक्षा यात गुंतवणूक करणाऱ्या कंपन्यांची गुंतवणूकच डोळे फिरवणारी आहे. विवो कंपनीने तर पाच वर्षांसाठी एक हजार कोटींना आयपीएलची स्पॉन्सरशिप खरेदी केली आहे. जर ही स्पर्धा रद्द झाली तर या कंपनीला ४०० कोटींचे नुकसान सोसावे लागणार आहे. एवढेच नाही तर आयपीएलचे ऑनलाइन लाइव प्रसारण हॉटस्टारवर होणार होते. आता ते होणारच नसल्याने हॉटस्टारने बीसीसीआयला प्रसारण हक्कासाठी जेवढे पैसे मोजले होते, ते मागे घेतले जातील. त्यामुळे बीसीसीआयला तब्बल चार हजार कोटींचा फटका बसण्याची शक्यता अमेरिकेतील बँक डिव्हिजन बोफा सिक्युरिटीजच्या अहवालात व्यक्त केली आहे.खेळाडूंसोबत फ्रँचाइजींचे किती नुकसान?
आयपीएलमधील बड्या माश्यांना जेथे प्रचंड नुकसान सोसावे लागत असेल तर तेथे छोट्या माश्यांचे काय होणार? मुळात हे छोटे मासेच मोठ्या माश्यांवर अवलंबून होते. त्यामुळे खेळाडूंनाही बरेच नुकसान सोसावे लागणार आहे. यात फ्रँचाइजींचं सोपं गणित आहे, ‘नो क्रिकेट, नो मनी.’ विदेशी खेळाडूंपेक्षा स्थानिक खेळाडूंचे नुकसान सर्वाधिक आहे. त्यांना २० ते ५० लाख रुपयांच्या आधारभूत किमतीवर खरेदी केले होते. त्यांना कदाचित या पैशांवर पाणी सोडावे लागणार आहे. अर्थात, फ्रँचाइजीच ते अदा करू शकणार नाही. फ्रँचाइजींचा विचार केला, तर या लीगमधील एकूण 8 फ्रँचाइजींनी जाहिरात आणि गेट मनीवर (तिकीट खरेदी) प्रचंड पैसा ओतला आहे. संघांच्या प्रायोजक रकमेच्या रूपातून एका संघाला किमान साडेचारशे ते पाचशे कोटी रुपयांचे नुकसान सोसावे लागण्याचा अंदाज आहे. याशिवाय संघांना तिकिटांच्या रूपाने 250 कोटींचा फटका सहन करावा लागणार आहे. कदाचित आयपीएलचे स्वरूप लहान केले तरी संघांचे नुकसान कमी होणार नाही.तुम्हाला कल्पना नसेल, पण आयपीएलमध्ये प्रत्येक स्पेस विकत मिळते. अगदी खेळाडू वापरत असलेल्या कपड्यांवर एखादा लोगो टाकायचा असेल तर त्यासाठी पैसे मोजावे लागतात. हा लोगो कुठे टाकायचा यावर पैसे कमी-जास्त होतात. संघातील खेळाडूंची जी जर्सी असते त्याच्या समोरच्या भागावर जी जाहिरात केली जाते त्यासाठी एका कंपनीला किमान १८ ते २० कोटी रुपये मोजावे लागतात. या जर्सीच्या मागच्या बाजूला जर जाहिरात करायची असेल तर त्यासाठी दीड कोटी आणि जर्सीच्या शोल्डरवर म्हणजे खांद्यावर जी जाहिरात केली जाते त्यावर तीन कोटी रुपये मोजावे लागतात. हा सगळा व्यवहार स्पर्धेआधीच झालेला असतो. हे सगळे पैसे अर्थातच संघमालकांना मिळतात. जर स्पर्धा रद्द झाली तर संघमालकांना हे पैसे मिळू शकणार नाहीत. स्थगितीमुळे कदाचित काही कंपन्या या जाहिराती मागेही घेऊ शकते. त्यामुळे जो पैसा आधी मिळणार होता, तो आता मिळणार नाही. फ्रँचाइजी आपला फायदा पाहत असते. जर फ्रँचाइजींना नुकसान सोसावे लागत असेल तर ते खेळाडूंना पैसा देणार नाहीत, हे स्पष्टच आहे. कदाचित फ्रँचाइजी 7500 कोटी रुपयांपर्यंत गुंतवणुकीतून कपात करू शकते. अर्थातच, या संपूर्ण नुकसानीचा फटका थेट बीसीसीआयलाच बसणार आहे.









Comments
Post a Comment
Please follow me